''Hi...''
फेसबुक वॉल स्क्रोल करत असताना आभाच्या मेसेंजरवर हिरवा दिवा लुकलूकला. सहसा कोणाला रिप्लाय न करणाऱ्या आभाने त्या दिवशी मात्र का कोण जाणे त्याला पटकन रिप्लाय दिला. फेसबुकवर बोलता बोलता दोघांमधली मैत्री हळूहळू वाढत गेली आणि मग ‘व्हॉट्स अँपवर असशीलच तू…’ या थोड्याशा जुन्या झालेल्या नंबर मागायच्या पद्धतीने त्या दोघांमधली मैत्री फेसबुक वरून व्हॉट्स अँपवर आली.
आपल्यापैकी बऱ्याच जणांची ही अशी ऑनलाईन मैत्री नक्कीच झाली असेल. जेव्हा हे सोशल मीडिया नावाचं साधन नव्हतं तेव्हा भेटीतून मैत्री निर्माण व्हायची. हल्ली पहिले ऑनलाईन मैत्री केली जाते आणि मग ठरवून भेटलं जातं.
जेव्हा आपण कोणासोबत तरी वेळ घालवतो तेव्हा आपल्याला समजून आपलं त्या व्यक्तीशी चांगलं जमू शकतं किंवा आपल्या आवडी-निवडींमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे आणि मग जसजसा आपल्या त्या व्यक्तीबरोबरचा सहवास वाढत जातो तशी ती मैत्री आणखी घट्ट होत जाते आणि अशा मैत्रीमध्ये सहसा दुरावा येत नाही. अगदी तुम्ही तुमच्या त्या मित्रापासून किंवा मैत्रिणीपासून लांब जरी गेलात तरी तुमच्यातली मैत्री टिकून राहते. अर्थात त्या मैत्रीलासुद्धा कधीतरी सोशल मीडियाचा आधार द्यावा लागतोच; परंतु त्याची मुळं ही आधीपासून घट्ट असतात त्यामुळे थोड्याशा आधारावरसुद्धा ती मैत्रीची वेल टिकून राहते.
जेव्हा आपण एखाद्याशी फेसबुक, इन्स्टाग्राम अशा माध्यमांमार्फत मैत्री करतो तेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवड-निवड याबद्दल आपल्याला काडीमात्र कल्पना नसते. जरी त्या व्यक्तीने तिचे छंद वगैरे त्या माध्यमांवर लिहिले असतील तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीचे छंद हे सारखे असूनही त्यात भिन्नता असू शकते. उदाहरण द्यायचं झालंच, तर दोन व्यक्तींना वाचनाची आवड असेल तरीसुद्धा त्यांचे आवडीचे विषय मात्र नक्कीच वेगळे असू शकतात.
आपण एखाद्या बरोबर जितका जास्त वेळ घालवतो तितकी ती व्यक्ती आपल्याला समजते. जर त्या दोन्ही व्यक्ती या एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये किंवा एकाच ठिकाणी नोकरी करत असतील तर त्या नक्कीच दिवसातला अर्धा वेळ हा त्या व्यक्तीबरोबर घालवत असतात. एकमेकांची सुख-दुःख वाटून घेत असताना त्यांच्यातील मैत्री दृढ होत जाते आणि मग त्यातूनच #bff, #friendsforever यांचा जन्म होतो. या उलट आपण जेव्हा आपली एखाद्याशी सोशल मीडियावर ओळख होते तेव्हा त्या व्यक्तीशी आपलं क्वचितच भेटणं होतं. त्याची मुळंच कमकुवत असल्याने ती मैत्री जपायला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ती कितपत टिकेल याचीही खात्री आपण देऊ शकत नाही.
थोडक्यात काय, तर सोशल मीडियावर झालेली मैत्री ही टिकेलंच याची खात्री देता येत नाही. मनापासून प्रयत्न केला तर ती टिकून राहुही शकते; पण तरीही परस्परांच्या भावना समजून, एकमेकांना प्रसंगी उपयोगी पडून आणि त्या व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करून झालेल्या मैत्रीची सर ऑनलाईन मैत्रीला थोडीच येणार आहे. भ्रमित जगात जगण्यापेक्षा वास्तवाचं भान ठेवून जगलेलं केव्हाही चांगलंच...
- प्रतिलिखित